नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉम्प्राईज्ड झाले आहेत का? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीबाबत पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी करत काँग्रेस नेतृत्वाला देशव्यापी निषेध आंदोलन उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहले आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
या पत्रात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी इपस्टिन फाईल, अमेरिका व्यापारी करार, डोकलाम प्रश्न, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय घडामोडींचा उल्लेख करत पंतप्रधानांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशाच्या सार्वभौमत्व, धोरणात्मक स्वायत्तता आणि राष्ट्रीय हिताशी संबंधित मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका आणि सार्वजनिक उत्तरदायित्व असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. (Prakash ambedkar)
संसदेसोबत जनआंदोलनाचीही गरज :
आंबेडकर यांनी म्हटले आहे की, काँग्रेसकडून संसदेत हे प्रश्न उपस्थित केले जात असले, तरी ते थेट जनतेपर्यंत पोहोचवणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे देशभरात लोकांच्या सहभागातून आंदोलन उभारण्याची आवश्यकता असल्याचा त्यांनी आग्रह धरला आहे.
विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन :
प्रस्तावित आंदोलनासाठी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि इतर भाजपविरोधी समान विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, भारतीय आदिवासी पक्ष, गोंडवाना गणतंत्र पक्ष, आझाद समाज पक्ष, अपना दल (कमेरावादी) तसेच अन्य संघटनांचा सहभाग असावा, असे त्यांनी पत्रात सुचवले आहे. (Prakash ambedkar)
सामाजिक संघटनांनाही सहभागी करण्याचा प्रस्ताव :
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच बौद्ध, मुस्लिम आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनाही या आंदोलनात सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडला आहे. अशा संघटनांची ताकद आंदोलन अधिक प्रभावी करू शकते, असेही त्यांनी नमूद केले. (Prakash ambedkar)
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण :
या पत्रामुळे विरोधी पक्षांच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात असून विविध पक्षांची पुढील भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






