– आकाश शेलार
सोशल मीडियावर आज जे चित्र दिसते ते पाहिले की मनात एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो. आपण खरंच चळवळ पुढे नेत आहोत की तिचे हलके रूप करून स्वतःचे प्रदर्शन करत आहोत. काही सेकंदांचे व्हिडिओ, भीमगीतांचा मोठा आवाज, जयभीमच्या घोषणा आणि त्यातून मिळणारे लाईक व फॉलोअर्स यांना प्रभावाचे मोजमाप समजले जाऊ लागले आहे. या सगळ्या गडबडीत विचार, अभ्यास, वाचन, संदर्भ आणि बौद्धिक जबाबदारी मागे पडताना दिसते. नाव मोठे आणि आशय पोकळ अशी अवस्था हळूहळू तयार होत आहे.
बुद्ध आणि बाबासाहेबांनी दिलेला वारसा घोषणांचा नव्हता. त्यांनी माणसाला विचार करायला शिकवले, प्रश्न विचारायला शिकवले, अन्यायाचे विश्लेषण करायला शिकवले. त्यांनी ग्रंथ लिहिले, तत्त्वज्ञान उभे केले आणि माणसाला माणूस म्हणून उभे राहण्याची ताकद दिली. आज मात्र त्यांच्या नावावर काही जण स्वतःची प्रतिमा उभी करताना दिसतात. वाघ, वाघीण, पँथर, कोब्रा अशी बिरुदे लावून फिरण्यात क्रांती नसते. त्यातून लक्ष वेधून घेण्याची धडपड दिसते, पण विचारांची सखोलता दिसत नाही. माणुसकीचा संदेश देणाऱ्या विचारधारेत स्वतःची ओळख पुन्हा प्राण्यांच्या प्रतिमांमध्ये बंदिस्त करणे ही मोठी विसंगती आहे.
हे मान्य करावे लागेल की सर्वच रील्स करणारे तरुण असे नाहीत. काही जण प्रामाणिकपणे ग्रंथांची ओळख करून देतात, अभ्यासाची प्रेरणा देतात, विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांची संख्या कमी आणि गोंगाट करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे एक वेगळेच चित्र तयार होते. त्यामुळे टीका ही माध्यमावर नाही, तर माध्यमाचा उथळ वापर करून स्वतःची प्रतिमा उभी करणाऱ्या प्रवृत्तीवर आहे.
दिव्या शिंदेचे बिग बॉसमधील प्रकरण याच पार्श्वभूमीवर पाहावे लागेल. एका लोकप्रिय कार्यक्रमात तिच्या वर्तनामुळे तिला घरातून बाहेर काढण्यात आले आणि त्यावरून मोठी चर्चा झाली. समर्थन आणि विरोध दोन्ही प्रतिक्रिया उमटल्या. पण या घटनेतून एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट झाला. सोशल मीडियावर तयार होणारी प्रतिमा आणि वैचारिक पात्रता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रसिद्धी मिळाली म्हणून व्यक्ती विचारांची प्रतिनिधी ठरत नाही. पण आपणच लोकप्रियतेला प्रतिनिधित्व समजतो आणि तिथेच गोंधळ सुरू होतो.
अभ्यासू, संदर्भ देऊन बोलणारे, शांतपणे लेखन करणारे लोक बाजूला पडतात ही खरी खंत आहे. त्यांच्या पोस्ट वाचल्या जात नाहीत, चर्चांना प्रतिसाद मिळत नाही. कार्यक्रमांमध्येही अभ्यासकांपेक्षा चर्चेत असलेल्या चेहऱ्यांना जास्त मान दिला जातो. आपण कोणाला पुढे आणतो यावरच समाजाची बौद्धिक दिशा ठरते. आवाज मोठा असला की आशय मोठा असतोच असे नाही, हे आपण वारंवार विसरतो.
इतिहास पाहिला तर संघर्ष करणाऱ्यांनी प्रतिमेपेक्षा विचारांना प्राधान्य दिले. दलित पँथर हा शब्द केवळ आकर्षण नव्हता. त्यामागे कविता होती, लेखन होते, रस्त्यावर उतरायची तयारी होती आणि वैचारिक स्पष्टता होती. आज तोच शब्द सामाजिक माध्यमांच्या प्रोफाईलमध्ये शोभतो, पण त्यामागे विचारांची परंपरा दिसत नाही. घोषणा मोठ्या आहेत पण अभ्यासाची शिस्त नाही. आक्रमक भाषा आहे पण तत्त्वनिष्ठ भूमिका नाही.
आंबेडकरी ओळख ही मिरवण्याची वस्तू नाही. ती नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येक जण ती पेलू शकत नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती लोकप्रिय झाली म्हणून ती विचारांची ध्वजवाहक ठरत नाही. पण आपणच अशा व्यक्तींना डोक्यावर घेतो आणि नंतर त्यांच्या वागण्याने संपूर्ण चळवळीची प्रतिमा मळते. दिव्या शिंदेचे प्रकरण हे त्याचे ठळक उदाहरण आहे. एका व्यक्तीच्या वर्तनावरून संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व ठरवले जाऊ नये, पण अशा व्यक्तींना अवाजवी प्रसिद्धी देऊन आपणच त्या दिशेने पाऊल टाकतो.
आज गरज आहे ती आत्मपरीक्षणाची. जयभीम म्हणणे महत्त्वाचे आहे, पण त्याहून महत्त्वाचे आहे बाबासाहेब वाचणे. स्टेटस ठेवणे सोपे आहे, पण त्यांच्या विचारांवर चर्चा करणे कठीण आहे. सोशल मीडियावर प्रतिमा तयार करणे सोपे आहे, पण बौद्धिक व्यक्तिमत्व घडवणे अवघड आहे. तरीही हाच मार्ग स्वीकारावा लागेल.
कोणतीही सामाजिक चळवळ दृश्य आकर्षणावर उभी राहत नाही. ती उभी राहते विचारांच्या पायावर, अभ्यासाच्या सवयीवर आणि नैतिक बांधिलकीवर. आपण घोषणांच्या गजरात विचारांचा आवाज हरवू देत आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. व्यक्तिपूजेपेक्षा विचारपूजेला महत्त्व देण्याची वेळ आली आहे.
आंबेडकरी चळवळ टाळ्यांनी उभी राहिलेली नाही. ती विचारांनी उभी राहिली आहे. पुढेही ती विचारांनीच टिकेल. बाकी सगळा गोंधळ क्षणिक आहे. लोकप्रियतेच्या मोहातून बाहेर पडून बौद्धिक प्रगल्भतेकडे वळणे हीच खरी जबाबदारी आहे. हीच विचारांना दिलेली खरी आदरांजली आहे.





