मुंबई: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कार्यरत असलेल्या हजारो कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे.
‘महाराष्ट्र राज्य मनरेगा कर्मचारी संघटने’च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले गेले असून, आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्हा MIS समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

आंदोलकांच्या मुख्य मागण्या:
इतर शासकीय योजनांमधील कर्मचाऱ्यांप्रमाणेच मनरेगामधील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करून त्यांचे समायोजन करण्यात यावे.
‘S-2 Infotech’ कंपनीमार्फत सुरू असलेली अनधिकृत भरती प्रक्रिया तत्काळ थांबवून या कंपनीचा करार रद्द करावा. त्याऐवजी सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती राज्य निधी असोसिएशन (सोसायटी) मार्फत करावी आणि ‘समान काम, समान वेतन’ हे धोरण लागू करावे.
मनरेगा विभागासाठी इतर विभागांप्रमाणे स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा आणि पदनिहाय आकृतीबंध (Cadre Structure) तयार करून त्यास शासन मान्यता देण्यात यावी.






