कोल्हापूर : “देशातील लोकशाही टिकवण्यासाठी राजकीय पक्ष जिवंत राहणे आवश्यक आहे. मात्र, सध्या भारतीय जनता पक्ष इतर सर्व राजकीय पक्ष संपवण्याचे राजकारण करत आहे. मतदारांना ५-५ हजार रुपये देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण, २०- २५ हजार रुपयांसाठी तुम्ही तुमची लोकशाही स्मशानात नेणार का?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरकरांना विचारला.
कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर आयोजित ‘विजयी संकल्प महासभेत’ ते बोलत होते. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

‘समझोत्यांचे राजकारण’ पक्षांचा ऱ्हास करणारे –
महानगरपालिका निवडणुकांच्या धावपळीवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले की, १३० जागांच्या सभागृहात अनेक पक्षांकडे १३० उमेदवारही नाहीत. अशावेळी केवळ जागा भरण्यासाठी राजकीय समझोते केले जात आहेत. “या समझोत्यांमुळे काही ठिकाणी पक्ष जिवंत राहिले, तर काही ठिकाणी ते कायमचे संपले. सत्ता मिळवणे हेच एकमेव ध्येय झाल्यामुळे राजकीय पक्षांचा ऱ्हास होत आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे-अजित पवारांना टोला –
भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “भाजपसोबत राहून कोण जास्त इमानदार आहे, याची स्पर्धा या दोन पक्षांत लागली आहे. मुंबईत भाजप शिवसेनेला सन्मानजनक जागा देईल का? ३० जागा देऊन गप्प बसायला लावेल, हा आरएसएस आणि भाजपचा खेळ आहे. त्यांना शेवटी एकटाच शिलेदार उरलेला हवा आहे.

“मतांची ‘झुंडशाही’ उभी करा –
पैशांच्या राजकारणावर प्रहार करताना आंबेडकर म्हणाले, “एक मत ५ हजार रुपयांना विकत घेतले जात आहे. हा तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न आहे. ज्या दिवशी तुम्ही विकले जाल, त्या दिवशी महात्मा फुलेंचा लढा आपणच गाडला असेल. निवडणुकीत हेराफेरी आणि घोटाळे रोखायचे असतील, तर मतपेटीतून ‘मतांची झुंडशाही’ उभी करणे आवश्यक आहे.
“देशाच्या सुरक्षिततेवर चिंता –
आंबेडकर यांनी यावेळी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. “आर्मी चीफ चीनला शत्रू म्हणतात आणि पंतप्रधान मित्र म्हणतात. सरकार आणि सैन्याची भाषा वेगवेगळी असणे हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. विरोधी पक्ष कमकुवत असल्याने हे प्रश्न संसदेत विचारले जात नाहीत. जर युद्ध टाळायचे असेल, तर मोदींना सत्तेपासून दूर करणे हाच एकमेव मार्ग आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

कोल्हापुरात ‘वंचित’ सर्व जागा लढवणार-
कोल्हापूर शहराध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करत आंबेडकरांनी जाहीर केले की, कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडी प्रत्येक वॉर्डात निवडणूक लढवेल. “आमच्याकडे कार्यकर्ते ताकदवान नसतीलही, पण आम्ही मैदानात जिवंत आहोत. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आता फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांच्या चळवळीवर आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या महासभेला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे आगामी निवडणुकीत ‘वंचित’ मोठी मुसंडी मारणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला.






