तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा; प्रा. किसन चव्हाण यांचे शासनाला आव्हान
अहमदनगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज आमदार मोनिका राजळे यांच्या शेवगाव संपर्क कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या. (vanchit bahujan aghadi)
सकाळी साडेअकरा वाजता शेवगाव शहरातील आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली आणि दुपारी दोन वाजेपर्यंत हा मोर्चा सुरू होता. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकार आणि आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले.
प्रमुख मागण्या :
१) शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.
२) साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी उसाचा दर निश्चित करावा.
३) कापसाला हमीभाव मिळावा.
४) पोट खराब शेतीच्या दुरुस्त करून नोंदी लावण्यात याव्यात.
५) भूमि अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवावा.
‘काळी दिवाळी’ साजरी करण्याचा इशारा –
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. किसन चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर वंचित बहुजन आघाडी व अधिकाऱ्यांची बैठक तहसीलदारांनी या संदर्भात लावली नाही आणि मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील निवासस्थानी चटणी भाकर खाऊन ‘काळी दिवाळी’ साजरी करू. (vanchit bahujan aghadi)
मोर्चाला सामोरे जाताना शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करून शेतकऱ्यांना देण्यात येतील असे आश्वासन दिले.