अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी रोड, सांगवी येथील गोसावी वस्तीमधील शेकडो भटक्या आदिवासी कुटुंबांची पिवळी रेशन कार्ड (अंत्योदय कार्ड) काढून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ममदाबाद येथील रेशन दुकानदार राम बिराजदार याने ५५ कुटुंबांकडून प्रत्येकी रु. २००० ते रु. १०,००० पर्यंतची रक्कम घेऊनही अद्याप रेशन कार्ड काढून दिलेली नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून शासनाने पिवळे रेशन कार्ड देण्याचा निर्णय बंद केलेला असतानाही, अशिक्षित गोसावी समाजाची दिशाभूल करून ही फसवणूक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळाबाई सहदेव पवार आणि बेबी गोपी पवार यांच्या नावावर दोन बनावट पिवळी रेशन कार्ड देण्यात आली आहेत. या कार्डांची नोंद तहसील कार्यालयात तसेच ऑनलाईन देखील करण्यात आली नही. त्यामुळे ही बोगस कार्ड कुठून आली, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित रेशन दुकानदार राम बिराजदार याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने अक्कलकोटचे तहसीलदार मगर साहेब यांच्याकडे २५ जून २०२५ रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
जर येत्या आठ दिवसांत यावर कारवाई झाली नाही, तर गोसावी समाजाला सोबत घेऊन तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. याप्रकरणी माननीय जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्र्यांनी लक्ष घालून फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून या आदिवासी भटक्या समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन
जालना : परमेश्वर हिवाळे यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षेच्या नावाखाली २३ मे २०२६ रोजी कैन्हानगर, जालना येथे अमानुषपणे शेण चारून,...
Read moreDetails






