मुंबई : दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळी येथील बीडीडी चाळ परिसरात पोलिसांनी साऊंड सिस्टम बंद करण्यास सुरुवात केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. नागरिकांनी वारंवार विनंती करूनही पोलिसांनी कारवाई सुरू ठेवल्यामुळे जयंतीच्या उत्साहात अडथळा निर्माण झाला.
या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. वरळीतील जांबोरी मैदान येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले. जयंती साजरी करण्यावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली.
घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्य आकाश अशोक दोडके, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष राकेश बुवा कांबळे, वरळी तालुका समन्वयक राज सावंत, मोहम्मद नबी शेख, सुरेश यादव, निर्भय माने, युवा आघाडी महासचिव दिप्ती गोडबोले, तसेच आकाश दोडके आणि इतर पदाधिकारी यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त विक्रम देशमाने, उपायुक्त झोन ३ उपाध्याय आणि एसीपी शालिनी शर्मा यांच्याशी चर्चा केली.
स्थानिक रहिवासी व आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर पोलिस प्रशासनाने जयंती साजरी करताना कोणतेही अडथळे निर्माण न करण्याचे मौखिक आश्वासन दिले. तसेच १४, १५ आणि १६ एप्रिल या कालावधीत नागरिकांनी शांततेत आणि उत्साहात जयंती साजरी करावी, असेही सांगण्यात आले.
यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून नागरिकांनी आनंदाने आपल्या राहत्या ठिकाणी परतत जयंती उत्साहात साजरी करण्यास सुरुवात केली आहे.





