मनमाड : मनमाड बसस्थानक हे परिसरातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून, येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, बसस्थानक परिसरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागत होते. तसेच चालक, वाहक आणि आगारातील कर्मचाऱ्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या समस्येची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडी, मनमाडच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) मनमाड आगार प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, तसेच वॉटर कूलर अथवा फिल्टर बसवावा आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मागणीची तातडीने पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शहराध्यक्ष विलास आहिरे यांनी दिला होता.
वंचित बहुजन आघाडीच्या या मागणीची आगार प्रशासनाने तत्काळ दखल घेतली असून, मनमाड आगार व्यवस्थापकांनी लेखी आश्वासन दिले आहे. बसस्थानक तसेच आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांसाठी लवकरच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येईल, असे प्रशासनाने लेखी स्वरूपात कळवले आहे.
आगार प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, प्रवाशांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, जिल्हा सचिव कादिर शेख, शहर उपाध्यक्ष निलेश निकम, शहर महासचिव अमोल केदारे, शहर संघटक सुनील बागुल, रुपेश जाधव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






