बुलढाणा : वंचित बहुजन महिला आघाडी बुलढाणा जिल्ह्याच्यावतीने जिल्ह्यातील विविध ज्वलंत समस्यांबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात सरकारच्या धोरणांवर कठोर शब्दांत टीका करत पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.
1. एससी, एसटी व महिला-बालकल्याण योजनांचा निधी लाडक्या बहिणीच्या योजनेत वळवणाऱ्या निर्णयाचा निषेध –
अनुसूचित जाती व जमातींसाठी तसेच महिला व बाल संगोपन योजनेसाठी मंजूर असलेला कोट्यवधींचा निधी दुसऱ्या ठिकाणी वापरणे म्हणजे संविधानाचा अपमान असून, वापरलेला निधी पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
2. संजय गांधी व श्रावण बाळ निराधार मानधन योजनेतील विलंब दूर करावा –
गेल्या तीन महिन्यांपासून निराधार, वृद्ध, अपंग व विधवा लाभार्थ्यांना मानधन मिळाले नाही. यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे मानधन तात्काळ वितरित करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
3. ऊसतोड महिला कामगारांच्या जबरदस्तीने काढलेल्या गर्भपिशव्यांबाबत चौकशी –
बीड जिल्ह्यात ८४३ ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढण्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि महिलांना न्याय द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
4. ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ११वी प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन ठेवावी-
ऑनलाइन प्रक्रियेमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील पालक व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून, मागील वर्षीप्रमाणे यंदाही ऑफलाइन प्रक्रिया सुरू ठेवावी आणि प्रवेशासाठी किमान २० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
शासनाने वरील मागण्यांचा तात्काळ विचार करून निर्णय घ्यावा, अन्यथा वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. या वेळी खामगाव येथे निवेदन देण्यासाठी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विशाखाताई सावंग, संघपाल जाधव, सुमनबाई थाटे, राजूभाऊ हेलोडे, दादाराव हेलोडे, रमेश गवारगुरु, मनोहर जाधव, सुनील वाकोडे, शेषराव तायडे, अंबादास दोडे, बाळू मोरे, राजवर्धन शेकोकार, विशाल हिवराळे, नंदा लांडगे, प्रमिला सूर्यवंशी, सपना गवई यांच्यासह अनेक महिला-पुरुष सहभागी होते.
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर
पुणे : आदिवासी भटके विमुक्तांनी देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण केली पाहिजे तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि...
Read moreDetails






