मुंबई : भारत पाकिस्तान तणावा दरम्यान शहिद झालेले जवान अग्निवीर मुरली नाईक यांच्या निधनानंतरही त्यांच्या कुटुंबाला अद्याप सरकारकडून कोणतीही भरपाई मिळालेली नाही, अशी गंभीर माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.“मी पुन्हा स्पष्ट करतो की, कोणतीही भरपाई मिळालेली नाहीये,” असे म्हणत त्यांनी शासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देणे, मुंबईत त्यांच्या कुटुंबाला घर उपलब्ध करून देणे आणि मुंबईत मुरली नाईक यांच्या नावाने एक स्मारक उभारणे या मागण्यांसाठी ते लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.तसेच, अग्निवीर योजनेंतर्गत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना नियमित सैन्यातील शहीद जवानांच्या कुटुंबांसारखीच पेन्शन मिळावी, यासाठी वंचित बहुजन आघाडी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.