औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाव-खेड्यांमध्ये वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकानांसाठी तातडीने जाहीर प्रकटन काढावे, तसेच वर्षानुवर्षे इतर दुकानांना संलग्न ठेवण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानांचे स्वतंत्रपणे वाटप करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात लोकसंख्या वाढलेल्या काही मोजक्याच ठिकाणांसाठी नवीन स्वस्त धान्य दुकानांचे जाहीर प्रकटन काढण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांची लोकसंख्या विचारात घेता अनेक ठिकाणी नवीन स्वस्त धान्य दुकानांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील पात्र गावांसाठी नवीन स्वस्त धान्य दुकानांचे जाहीर प्रकटन काढण्यात यावे.
तसेच जिल्ह्यात अनेक स्वस्त धान्य दुकाने विविध कारणांमुळे वर्षानुवर्षे इतर दुकानांना संलग्न ठेवण्यात आली आहेत. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असून पुरवठा व्यवस्थेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे अशा सर्व संलग्न दुकानांचे स्वतंत्र जाहीर प्रकटन काढून नियमानुसार नवीन परवानाधारकांना दुकाने वाटप करण्यात यावीत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
या मागण्यांवर जिल्हा प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, पूर्व जिल्हा महासचिव सूरज पाटील मूळे, जिल्हा संघटक राजन किर्तने, जिल्हा संघटक रवी रत्नपारखे, जिल्हा सचिव उमेश सरदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.





