पुणे : औरंगाबादमधील एका पीडित महिलेला मदत केल्याप्रकरणी पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्यांना कोथरूड पोलिसांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता अटक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तातडीने संबंधित दोषी पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पतीच्या त्रासाला कंटाळून संभाजीनगर येथून पुण्यात आलेल्या एका विवाहित महिलेला तीन सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. त्यांनी तिला ‘वन स्टॉप सखी सेंटर’मध्ये दाखल केले आणि स्वावलंबी होण्यासाठी मदत करत होत्या.
मात्र, या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक संभाजीनगर येथील निवृत्त पोलीस अधिकारी असल्याचा आरोप आहे. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुणे पोलिसांच्या मदतीने या तीन कार्यकर्त्यांना मध्यरात्री त्यांच्या घरातून ताब्यात घेतले.
कायदा म्हणजे कायदाच असतो!
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढे म्हटले की, कोथरूड पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय या महिलांना अटक केले आणि पोलीस ठाण्यात नेले. या महिलांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी टाळाटाळ केली. तसेच, मध्यरात्री घरात घुसून जातीय आणि स्त्रीद्वेषी शिवीगाळ केल्याचा आरोपही पीडित महिलांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुणे शहराच्या पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून तातडीने एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देत सांगितले की, कोणत्याही संज्ञेय गुन्ह्याची माहिती मिळाल्यास एफआयआर नोंदवणे पोलिसांना बंधनकारक आहे. कायदा म्हणजे कायदाच असतो! असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या पुणे जिल्हा समित्यांनी आंदोलन केले आहे. जर पोलिसांनी लवकरच एफआयआर दाखल केला नाही, तर मोठ्या संख्येने एसपी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.