औरंगाबाद : मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांवर सुमारे 140 भारतीय जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. या जहाजांवर काही भारतीय नागरिकही अडकले असण्याची शक्यता असून त्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, यासाठी भारत सरकारने तातडीने विशेष हवाई किंवा समुद्री वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मध्य-पूर्वेतील संघर्षामुळे काही जहाजांना परत येण्यासाठी सुरक्षित मार्ग मिळत नसल्याची माहिती मिळत असून अनेक जहाजे समुद्रातच थांबलेली आहेत, असे त्यांनी सांगितले. सुरुवातीच्या माहितीनुसार या जहाजांवर भारतीय नागरिकही अडकलेले असू शकतात आणि ही संख्या पुढे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या भागातील भारतीय दूतावासांनी अधिक सक्रिय भूमिका घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Prakash Ambedkar)
इराक, इजरायल, अमेरिका आणि ईराण या देशांशी संबंधित तणावपूर्ण परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांनाही मदत करणे कठीण जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भारत सरकारने अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी तातडीने विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
युद्ध सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजरायलचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबतही देशासमोर स्पष्टता असणे आवश्यक असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. (Prakash Ambedkar)
मध्य-पूर्वेतील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक काम करत असून भारताची परराष्ट्र नीती धार्मिक दृष्टीकोनातून नव्हे तर संतुलित आणि व्यावहारिक पद्धतीने राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
युद्ध दीर्घकाळ चालल्यास त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि बँकिंग क्षेत्रावरही होऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. तणावपूर्ण परिस्थितीत आर्थिक व्यवस्थेवर दबाव वाढू शकतो, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत असल्याचेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. (Prakash Ambedkar)
सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे समुद्रातील जहाजांची लोकेशन ट्रॅक करणे शक्य आहे. त्यामुळे अडकलेल्या जहाजांची अचूक माहिती मिळवून त्यांच्याशी संपर्क ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
जग सध्या तणाव आणि अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात असल्याने सर्व देशांनी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी एकत्रितपणे काम करून नागरिकांची सुरक्षा आणि जागतिक शांतता टिकवण्यावर भर द्यावा, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. (Prakash Ambedkar)






