नाशिक : नाशिकमधील अरिंगळे मळा परिसरात प्रस्तावित रिंग रोडमुळे घरे अतिक्रमणात जाण्याच्या भीतीने आठ महिलांनी सुरू केलेले अमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. विशेष म्हणजे हे उपोषण कोणत्याही मंत्री, आमदार किंवा खासदारांच्या हस्ते नव्हे, तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन (दादा) गांगुर्डे यांच्या हस्ते सोडण्यात आले.
अरिंगळे मळा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे १५० हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही कुटुंबे खाजगी जागेत राहत असून त्यांना घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता अधिकाऱ्यांनी या भागात मोजणी केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. (Nashik News)
सदर रिंग रोड ६० मीटर रुंदीचा करण्याचा प्रस्ताव असून, तो किमान १ किलोमीटर अंतरापर्यंत ४० मीटरपर्यंत मर्यादित ठेवावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. या मागणीसाठी परिसरातील आठ महिलांनी अमरण उपोषण सुरू केले होते.

या आंदोलनाची माहिती दूरध्वनीद्वारे ॲड बाळासाहेब आंबेडकर यांना देण्यात आली. त्यांनी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करत स्थानिकांच्या प्रश्नासाठी पुढील लढा वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे आश्वासन दिले. (Nashik News)
दरम्यान, मंगळवारी (दि. १०) रात्री सुमारे ८.३० वाजता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते दिनेश जाधव, सम्यकचे जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे, महासचिव पंडित नेटावते तसेच स्थानिक नगरसेविका भारती तंजापूरे, नगरसेवक योगेश भोर आणि माजी नगरसेवक संतोष साळवे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलक महिलांशी सविस्तर चर्चा केली. (Nashik News)
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनावर आणि दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवत आंदोलनकर्त्या महिलांनी आपले अमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीने या वस्तीसोबत उभी राहील, असा विश्वासही स्थानिक नागरिकांना देण्यात आला.






