नांदेड : गट क्रमांक ६१ (अ), नवीन श्रावस्ती नगर परिसरात मागील जवळपास २० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बौद्ध समाजातील १५० हून अधिक कुटुंबांच्या घर-जमिनीवर कथितरीत्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक प्रा. कुलदीप राक्षसमारे, महासचिव श्याम कांबळे तसेच सम्यकचे नेते आतिश ढगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
नवीन श्रावस्ती नगर परिसरात बौद्ध समाजातील १५० हून अधिक कुटुंबे गेल्या सुमारे २० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. तसेच परिसरात मुस्लिम समाजातील काही कुटुंबांचीही घरे आहेत. नागरिकांच्या माहितीनुसार, परिसरातील १०९ घरांची रजिस्ट्री झालेली असून काही घरांच्या रजिस्ट्रीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संतोष सिंह चौधरी नावाच्या व्यक्तीकडून कथित कागदपत्रांच्या आधारे तसेच न्यायालयाचा आदेश असल्याचा दावा करत नागरिकांच्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित व्यक्ती काही लोकांना सोबत घेऊन परिसरात येत मोकळ्या भूखंडांवर जबरदस्तीने बांधकाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आणि नागरिकांना घर सोडण्याच्या धमक्या दिल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
प्रकरणाची माहिती मिळताच नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्याकडे संपूर्ण घटनेची माहिती देत नागरिकांच्या सुरक्षेची मागणी केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी तातडीने पोलीस पथक घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित व्यक्ती व त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना तेथून हटवले. त्यामुळे परिसरातील तणाव निवळला असून नागरिकांना दिलासा मिळाला.
दरम्यान, न्यायालयाचा आदेश किंवा मालकी हक्कासंदर्भात कोणताही दावा असल्यास तो कायदेशीर मार्गाने आणि संबंधित अधिकाऱ्यांसमोर आवश्यक कागदपत्रांसह मांडावा. कायदा हातात घेऊन नागरिकांना धमकावणे किंवा त्यांच्या घर-जमिनीवर जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मांडली.
गेल्या २० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या घरांवर किंवा जमिनीवर दहशत निर्माण करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले. या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी आणि पोलीस पथकाचे नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक प्रा. कुलदीप राक्षसमारे, महासचिव श्याम कांबळे, युवा नेते महेंद्र पवळे, सम्यकचे आतिश ढगे, अभय सोनकांबळे, बंटी गायकवाड, अमर वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



