मुंबई : मिरा-भाईंदर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेशद्वारावरील महामानवाचा नामफलक अनधिकृत बॅनरने झाकून त्यांचा अवमान केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या १२ तासांच्या तीव्र ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात संबंधित जबाबदार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हा आंबेडकरी जनतेच्या वज्रमुठीचा विजय मानला जात आहे.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, मिरा-भाईंदर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरच्या मुख्य प्रवेशद्वारावर महामानवाचा नामफलक आहे. मात्र या फलकावर मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माजी महापौर डिंपल मेहता आणि आमदार नरेंद्र मेहता यांचे छायाचित्र असलेले अनधिकृत बॅनर लावून मूळ नाव पूर्णतः झाकून टाकण्यात आले होते. या कृत्यामुळे स्थानिक आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
या घटनेची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला. सुरुवातीला प्रशासनाने केवळ बॅनर हटवून कारवाईची औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करत दि. ४ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. रात्री ११:०० वाजेपर्यंत तब्बल १२ तास हे आंदोलन सुरू होते. वंचित बहुजन आघाडीसह विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने प्रशासनावर प्रचंड लोकदबाव निर्माण झाला.
आंदोलनाच्या दबावापुढे झुकत भाईंदर पोलिसांनी ४ मे रोजी रात्री ११:३० वाजता FIR क्रमांक ०१७५/२०२६ अंतर्गत गुन्हा नोंदवला. यामध्ये महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियम, १९९५ च्या कलम ३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या विजयाबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे मिरा-भाईंदर शहराध्यक्ष इकबाल महाडिक यांनी सांगितले की, हा विजय केवळ एका आंदोलनाचा नाही, तर महामानवाच्या सन्मानासाठी उभ्या राहिलेल्या जनशक्तीचा आहे. प्रशासनाने शेवटी कायद्याचा सन्मान केला आहे, मात्र भविष्यात कोणत्याही महापुरुषाचा अवमान किंवा अवैध बॅनरबाजी सहन केली जाणार नाही.
या आंदोलनात महासचिव अनिल उत्तमराव भगत, ताहीरभाई महाडिक, साजिदभाई शेख, इम्रानभाई शेख, फैज शेख, महिला आघाडीच्या यास्मिनताई खान, अस्मिताताई कदम, शाकीलाताई शेख, नसरीनताई खान, जयबुनिशाताई खान, युवा आघाडीचे उमेश शिंदे, पंकज इंगोले, राहुल डोईफोडे, पीटर डिसोजा, दिलीप भालेराव, भारतीय बौद्ध महासभेचे सुभाष ठोंबरे गुरुजी, सिद्धार्थ वानखेडे गुरुजी आणि भीम आर्मीचे आसिफ मंसूरी, झहीर काजी, संतोष तांबे, मोहन दामले यांच्यासह मोठ्या संख्येने भीमसैनिक व नागरिक उपस्थित होते. या यशस्वी लढ्यामुळे मिरा-भाईंदरमध्ये प्रशासकीय हलगर्जीपणाविरुद्ध सर्वसामान्यांचा आवाज बुलंद झाला आहे.




