मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिलेल्या ४८ तासांच्या आवाहनाला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आंबेडकर म्हणाले की, मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, लातूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, गोंदिया, भंडारा, जळगाव, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी आणि विविध संघटनांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत केंद्र सरकारविरोधातील भावना व्यक्त केली. या आंदोलनाला डावे पक्ष, काँग्रेस तसेच विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारावा, अशी मागणी केली.
महाराष्ट्र बंद शांततेत पार पडल्याचे सांगताना त्यांनी अकोल्यातील मूर्तिजापूर येथे दुकानांची तोडफोड झाल्याची एक घटना वगळता अन्य कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले. पुढील आंदोलनाचा आराखडा जंतर-मंतरवरील आंदोलनकर्ते, विविध पक्ष आणि संघटनांशी चर्चा करून ठरवला जाईल, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि गुणवत्तेशी (मेरिट) खेळ सुरू असल्याचा आरोप करत, पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस आराखडा जाहीर करेपर्यंत दिल्लीतील आंदोलन सुरू राहील आणि त्याला महाराष्ट्रातूनही पाठिंबा कायम राहील, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. लोकशाहीत प्रश्न चर्चेतून सोडवले जावेत, हुकूमशाहीच्या मार्गाने नव्हे, असे त्यांनी म्हटले. २६ जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याबाबत विचारले असता, अद्याप कोणतेही निमंत्रण मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणत्याही पक्षाने आंदोलन केले तर त्याला विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत पेपरफुटी प्रकरण, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, पोलिसांच्या कारवाईवर टीका तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओंचाही त्यांनी उल्लेख केला. काही पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली. शिक्षण व्यवस्थेतील पेपरफुटीमुळे गुणवत्तेचा निकष धोक्यात आल्याचे सांगत त्यांनी परीक्षेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.
सुप्रीम कोर्टाबाबत बोलताना, संविधानातील कलम १४ आणि २१ च्या अंमलबजावणीस न्यायव्यवस्थेने प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत संविधान संरक्षणाची जबाबदारी सर्वोच्च असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘महाराष्ट्र बंद’ला राज्यात मोठा प्रतिसाद ! ―
दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचारा विरोधात फक्त 48 तासात महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद राज्यातील जनतेने दिला. मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, लातूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांसह राज्यातील सर्व जिल्ह्यांनी सरकार विरोधात आपला राग व्यक्त केला.
या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणारे काँग्रेस, डावे पक्ष, सामाजिक संघटना यातील लोकं सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पहिल्यांदाच महाराष्ट्रात राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. ज्याला जनतेने मोठा प्रतिसाद दिला.





