कोकण : कोकणात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी पूर आले.
रायगडमध्ये ‘रेड अलर्ट’
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक असून, सावित्री, आंबा, आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. महाड शहराला सावित्री नदीच्या पाण्याने वेढले असून, रावढळ पुलावरून पाणी वाहत असल्याने महाड-रायगड दस्तुरी मार्ग बंद करण्यात आला आहे. नागठाणे येथील बस स्थानकात पाणी शिरल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पूरस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हाहाकार माजवला असून, जगबुडी, कोदवली, आणि शास्त्री नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे रत्नागिरीतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. सिंधुदुर्ग परिसरातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. संगमेश्वर, देवरुख, साखरपा, लांजा, आणि राजापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. संगमेश्वर येथे डोंगराचा भाग रस्त्यावर येत असल्याने वाहनचालकांना सिंधुदुर्गकडे जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
वाहतूक विस्कळीत, घरांमध्ये शिरले पाणी
रोहे शहर, आंबेवाडी नाका आणि कोलाड नाक्यावर पाणी शिरल्याने दुकानदारांची तारांबळ उडाली आहे. रोहा-नागोठणे मार्गावरील भिसेखिंड येथे दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. आंबेनळी घाटातील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. म्हसळा येथे १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
या गंभीर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पूरप्रवण भागात न जाणे, बचाव यंत्रणांशी संपर्क साधून अद्ययावत माहिती घेणे, तसेच तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे.