नांदेड : भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा किनवट यांच्या वतीने कोठारी येथील सांची बुद्ध विहारात वर्षावास निमित्त प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय शिक्षक व बौद्धाचार्य इंजि. एम. एम. भरणे (परभणी) यांनी ‘सिद्धार्थाचा गृहत्याग व ज्ञानप्राप्ती’ या विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचन दिले. त्यांनी सांगितले की, दु:खापासून मुक्ती मिळवण्यासाठी सिद्धार्थ यांनी राजवैभवाचा त्याग करून कठोर तपश्चर्या केली, मात्र त्यांना यश आले नाही. अखेरीस दृढ निश्चय आणि अधिष्ठानामुळे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी सारनाथ येथे प्रथम धम्माची शिकवण दिली.
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या संकल्पनेतून ही प्रवचन मालिका आयोजित करण्यात आली असून, इंजि. भरणे यांचे विविध शहरांमध्ये प्रवचन सुरू आहेत.
या कार्यक्रमाला तालुका सरचिटणीस बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे, तालुका संस्कार उपाध्यक्ष बौद्धाचार्य अनिल उमरे, तालुका संघटक भगवान मुनेश्वर, आयु. सांची कानिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बौ. अनिल उमरे यांनी वंदना घेऊन केली, तर आयु. निकिता कांबळे यांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन केले.
ग्राम शाखा अध्यक्ष सुधाकर हलवले, विजय पाटील व विजेंद्र कांबळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. बौ. महेंद्र नरवाडे यांनी प्रास्ताविक केले, तर बौ. भगवान मुनेश्वर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचा समारोप सरनतय गाथेने झाला. याप्रसंगी कोठारी येथील पदाधिकारी, उपासक-उपासिका आणि रमाई महिला मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन
औरंगाबाद : शहरातील सोमवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी भरत असलेल्या आठवडी बाजार बंद करण्याच्या इशाऱ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र...
Read moreDetails






