अमरावती : बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपवण्यात यावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तिवसा तालुक्यातून जोरदार पाठिंबा मिळत आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी या आंदोलनासाठी तालुक्यात जनजागृती अभियान सुरू केले आहे, ज्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून बुद्धगया येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे. तथागत गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली, त्या पवित्र महाविहाराचे व्यवस्थापन सध्या मनुवाद्यांच्या हातात असून ते बौद्ध समाजाकडे सोपवावे, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर, तिवसा तालुक्यातील बौद्ध जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी सागर भवते यांच्या नेतृत्वाखाली 20 ऑगस्टपासून जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत गावागावातील बुद्ध विहारांना भेटी दिल्या जात आहेत आणि महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समुदायाकडे असावे, या मागणीच्या समर्थनासाठी स्वाक्षरी मोहीमही राबवली जात आहे.
या अभियानामध्ये आत्तापर्यंत वरखेड, चांदुर ढोरे, ठाणा ठुनी, काटसुर, नमस्कारी, जावरा, फत्तेपुर, करजगाव, निंभोरा, डेहणी, शेंदूरजना बाजार, तळेगाव ठाकूर, उंबरखेड, धामंत्री या गावांना भेटी देण्यात आल्या आहेत. हे अभियान 5 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून, भांबोरा, पालवाडी, सातरंगाव, वरुडा, दापोरी, भारसवाडी, आखतवाडा, मूर्तिजापूर (तरोडा), मारडा, कुऱ्हा, चेनुष्ठा, जहागीरपूर, धारवाडा, कौंडण्यपूर या गावांमध्येही जनजागृती केली जाणार आहे. या अभियानाचा समारोप 5 सप्टेंबर रोजी बोर्डा येथे होणार असल्याची माहिती सागर भवते यांनी दिली.
हे जनजागृती अभियान यशस्वी करण्यासाठी प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, सचिन जोगे, भारत दहाट, मनीष खरे, सागर गोपाळे, नितीन थोरात, राजकुमार आसोडे, गजानन आसोडे, आणि डॉ. धर्मेंद्र दवाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
नवउदारमतवादाचा अस्त आणि फॅसिझमचा उदय: एका फसलेल्या जागतिकीकरणाचे विश्लेषण
- संजीव चांदोरकर जग किमान ४० वर्षे मागे गेले आहे ! नाही, ट्रम्प मुळे नाही. जागतिक अर्थव्यवस्था नवउदारमतवादाने आधीच कड्यावर...
Read moreDetails






