पुणे : भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष केवळ बौद्ध धर्मविरोधी नाहीत, तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात असून राष्ट्रविरोधी असल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत केला आहे.
या आरोपांमागे काही विशिष्ट घटना आणि ऐतिहासिक संदर्भांचा आधार देण्यात आला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सम्राट अशोकाने बनवलेला सिंहस्तंभ, जो स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आला, तो भगवान बुद्धांच्या शिकवणी आणि धम्माचे प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा सिंहस्तंभ राष्ट्रीय चिन्ह म्हणून आणि राष्ट्रीय ध्वजातील अशोकचक्र (गडद निळ्या रंगात) स्वीकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
बाबासाहेबांनी स्पष्ट केले होते की, ब्राह्मणवादी संस्कृतीतून कोणतेही योग्य चिन्ह न मिळाल्याने बौद्ध संस्कृती मदतीला आली आणि धम्मचक्र राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले गेले. सुरुवातीला भारतीय नोटांवरून राजाचे चित्र काढून त्या जागी महात्मा गांधींचे चित्र लावण्याचा विचार होता, परंतु तो प्रस्ताव नाकारण्यात आला आणि त्याऐवजी अशोक स्तंभ निवडण्यात आला.
महात्मा गांधींचे चित्र पहिल्यांदा 1969 मध्ये त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त नोटांवर आले आणि 1987 मध्ये राजीव गांधी सरकारने 500 रुपयांच्या नोटेवर ते पुन्हा आणले. अखेरीस 1996 मध्ये रिझर्व्ह बँकेने ‘महात्मा गांधी मालिका’ सुरू केली, ज्यानंतर सर्व भारतीय नोटांवर त्यांचे चित्र कायमस्वरूपी छापले गेले.
सद्यस्थितीवर बोट ठेवत ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, 2025 मध्ये भाजपने सरकारी जाहिरातींमधून अशोक स्तंभ हटवला, त्यानंतर महाराष्ट्र विधानमंडळातून अशोकचक्र हटवले आणि आता औरंगाबाद व कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयांमधील पोस्टर्समध्ये अशोक स्तंभाऐवजी “सेंगोल” ठेवण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर हे ‘सेंगोल’ असलेले पोस्टर्स काढण्यात आले. या सर्व घटनांच्या आधारे, काँग्रेसने बुद्ध विरोधी काम सुरू केले आणि भाजप ते पुढे नेत आहे.
भाजप आणि काँग्रेसने केवळ बुद्ध शिकवणी आणि धम्माची प्रतीकेच हटवली नाहीत, तर बाबासाहेबांनी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेली प्रतीके देखील हटवली आहेत. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष बौद्धविरोधी, बाबासाहेबांच्या विरोधात आणि राष्ट्रविरोधी आहेत. असेही ते म्हणाले.
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...
Read moreDetails