नांदेड सिटी, पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाच्या बळावर स्वतःचा आणि पर्यायाने संपूर्ण समाजाचा मार्ग बदलला. याची जाणीव ठेवून त्यांच्या विचारांच्या दिशेने भरारी घ्या, असे असे प्रतिपादन माजी न्यायाधीश सचिन जोरे यांनी केले.
बाबासाहेबांनी देशाला बहाल केलेल्या न्याय, स्वातंत्र्य आणि समतेच्या घटनात्मक मूल्यांची जपणूक करणे हीच काळाची गरज आहे. केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन जोरे यांनी केले. नांदेड सिटीत बहुजन हिताय संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी व्याख्यानात जोरे बोलत होते.
या तीन दिवसांच्या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनपर गीते आणि इतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून महामानवांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबीर, क्रीडा स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. बहुजन हिताय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्याचे यशस्वी नियोजन केले.
रॅलीत अवतरले महात्मा फुले अन् सावित्रीमाई!
सर्व समाज घटकांना एकत्र आणून समतेचा, बंधुभावाचा संदेश देत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये नांदेड सिटी व परिसरातील आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॉलीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत रघूनाथ ढोक व राखी रासकर हे सहभागी झाले होते.






