साकोली : महामानव भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडी, भंडारा यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी जयंती निमित्त केक कटिंग कार्यक्रम पार पडला. त्यानंतर उपस्थितांसाठी आलू भात व मट्ठा कढीचे सामूहिक भोजन आयोजित करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना उजाळा दिला. अत्यंत प्रतिकूल सामाजिक परिस्थितीतून उभे राहत त्यांनी मानवमुक्तीचा लढा दिला. शिक्षण, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजरचना घडवण्याचा त्यांचा ध्यास होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संरक्षण दिले.
महिला, कामगार, शेतकरी तसेच समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हाच विकासाचा मार्ग असल्याचा संदेश त्यांनी दिला आणि तोच संदेश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमात तनुजा नागदेवे, अमित नागदेवे, यादोराव गणवीर, गणेश गजभिये, करूणा शहारे, यशपाल गजभिये, भाग्यशाली मेश्राम, रोशन मेश्राम, बबीता राउत, जोशना खोबरागडे, प्रेमचंद खोबरागडे, कोकीळा रामटेक, नितेश डोंगरे, खुशी सहारे, गीता वलसाड, सविता डोंगरे, माला राउत, स्नेहा श्री खाडेकर, मनोज मडामे, जीतू वालथरे, रजनीश कराडे, कुसुम श्यामकुवर, अमावस्या नागदेवे, प्रतिमा पारधी, अशोक पारधी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांप्रमाणे समाजघडणीसाठी कार्य करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.






