दर्यापूर – दर्यापूर नगरपालिकेच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत विकासकामे रखडली असून, नागरिकांना अजूनही योग्य सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिकांत संतापाची भावना आहे. नगरपालिका प्रशासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर संकलन करते, मात्र नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित केल्या जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
नियमित कर न भरल्यास फौजदारी गुन्ह्यांची धमकी देणारे नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या विश्वासाला तडा देत आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी दर्यापूर येथील उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांची भेट घेऊन नगरपरिषदेच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी अधिकाऱ्यांना ठोस शब्दांत जाब विचारत नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी केली.
वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात शहरातील पाणीटंचाई, खड्डेमय रस्ते, अपूर्ण गटारी, कचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणा यांसारख्या मुद्द्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. संजय चौरपगार यांनी सांगितले की, “नागरिकांच्या पैशातून प्रशासन चालते आणि त्यांनाच सुविधा न मिळणे म्हणजे प्रशासनाचा अपमान आहे. जर लवकरात लवकर सुधारणा झाल्या नाहीत तर आंदोलन छेडले जाईल.”