चंद्रपूर : बांधकाम कामगारांना 90 दिवसांच्या नोंदणीवर नाहरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ग्रामसेवकांकडून होणाऱ्या टाळाटाळीविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयावर जोरदार हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्षा कविताताई गौरकर यांनी केले. यावेळी महिला आघाडीच्या महासचिव अल्काताई मोठघरे, करूनताई जिवणे, पुष्पलता कोटांगले, लताताई टिपले, भद्रावती तालुका अध्यक्ष संध्याताई पेटकर, वैशाली चिमुरकर, नगरसेविका राखीताई रामटेके व मिलिताई वाघ आदी पदाधिकारी आणि ग्रामीण भागातील शेकडो महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मोर्चादरम्यान महिलांनी ग्रामसेवकांच्या कामकाजातील हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत, नोंदणीकृत कामगार महिलांना लवकरात लवकर नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.