मुंबई: घाटकोपर येथील रहिवासी असलेले अग्निवीर मुरली नाईक यांना सेवेत असताना वीरमरण आले, मात्र त्यांच्या कुटुंबाला केंद्र किंवा राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, अग्निवीर नाईक यांना शहीदाचा दर्जा देऊन त्यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि सन्मान देण्याची मागणी केली आहे. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Prakash Ambedkar)
रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर येथील रहिवासी असलेले मुरली नाईक हे लाईट इन्फंट्रीमध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांचे निधन झाले. या घटनेनंतरही शासन स्तरावर उदासीनता असल्याची खंत ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “सैनिकांना मिळणाऱ्या सर्व सवलती आणि सन्मान अग्निवीरांनाही मिळायला हवा. महाराष्ट्र शासनाने सेवेत असताना वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबाला मदत करण्याची घोषणा केली आहे. मग मुरली नाईक यांच्या बाबतीत सरकार दुजाभाव का करत आहे?”
या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली असून लवकरच भेट होईल अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले. “मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून ही सर्व परिस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहे. केंद्र सरकार ‘ऑपरेशन सिंदूर’चे भांडवल करत आहे, पण दुसरीकडे एका अग्निवीराचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. (Prakash Ambedkar)
जर प्रशासनाने यावर तातडीने योग्य ती भूमिका घेतली नाही, तर आम्ही उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच ॲड. आंबेडकर यांनी जनतेलाही या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. “नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करावी,” असे ते म्हणाले. (Prakash Ambedkar)
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मुख्य मागण्या –
अग्निवीर मुरली नाईक यांना ‘शहीद’ म्हणून घोषित करावे.
त्यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी.
कुटुंबाच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्यावी.
मागण्या मान्य न झाल्यास, सरकार विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाईल.