पुणे – आकाश शेलार
भारत-पाकिस्तान संघर्ष असतो तेव्हा देशभरात गर्जना होते ‘जवाब दो, घुसून मारा’ पण जेव्हा देश खरंच घुसून मारायची स्थितीत येतो, तेव्हा आपलं नेतृत्व गप्प का बसतं? हाच थेट विचारलेला सवाल आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी.
ते म्हणाले की, “पाकिस्तानकडे फक्त १० दिवस पुरेल इतकाच दारुगोळा होता. आपण हल्ला करून त्यांना गुडघ्यावर आणू शकत होतो. मग आपण ही संधी गमावलीच का?” हा केवळ एक राजकीय टोला नाही, तर देशाच्या संरक्षण धोरणाला केलेला थेट सवाल आहे.
प्रकाश आंबेडकरांनी अगदी उघड शब्दांत सांगितलं की, “गल्लीत भांडण होतं तेव्हा जो भिडतो तो जिंकतो. जो गप्प बसतो त्याला ‘गांडू’ म्हणतात. देशाच्या लढाईतही तेच होतं. जेव्हा आपण माघार घेतो, तेव्हा लोक विचारतात गांडुगिरी का केली?” ही भाषा जरा उग्र वाटेल काहींना, पण यातून जनतेची मनस्थिती मांडली गेलीय. देशाच्या बाजूने भावना असलेले सामान्य लोक जे विचारतात, तेच आंबेडकरांनी थेट सरकारला विचारलंय.
संकट असं होतं की, आपल्याकडे शक्ती असूनही आपण ती वापरत नाही. अगदी मैदानात उतरलेला खेळाडू फायनलमध्ये जाऊन पाय घसरवतो, तसं झालंय. पाकिस्तानचा दारुगोळा संपत आला होता, आपल्या लष्कराकडे तयारी होती, पण वरच्या नेत्यांनी घाबरट धोरण घेतलं. हे कसलं धोरण? तुम्ही संधी का गमावली? का परत फिरलात? हेच ॲड. आंबेडकरांचे प्रश्न आहेत.
मोदी यांनी गेल्या काही वर्षांत जगभर दौरे केले. अमेरिका, फ्रान्स, रशिया कुठे कुठे गेले नाहीत. अनेक देशांचे दौरे केले, पण जेव्हा भारताला संघर्षात पाठिंबा हवा होता, तेव्हा हे सगळे देश गप्प का बसले? १९७१ मध्ये रशिया भारताच्या बाजूने उभा होता. आज तो पाकिस्तानला मदत करतो. फ्रान्सला आपण राफेल खरेदीसाठी हजारो कोटी रुपये दिले. तेही गप्प. मग हा एवढा दौरा आणि फोटोसेशन काय कामाचं?
मुंबईचा मुरली नाईक नावाचा अग्निवीर जवान भारत-पाक संघर्षात शहीद झाला. पण त्याला ‘शहीद’चा दर्जा दिला गेला नाही. त्याच्या कुटुंबाला सन्मान, मदत काहीच मिळत नाही. देशासाठी जीव देणाऱ्या माणसाला शासकीय परतावा नाही? हा जवान फक्त काही महिन्यांच्या करारावर देशासाठी लढतो आणि मेले तर त्याचं काहीच नाही? हा अपमान नाही का?
आज सरकारला प्रश्न विचारला की लगेच देशविरोधी असा शिक्का बसतो. पण खरं देशप्रेम म्हणजे अंध भक्ती नाही, तर सत्तेला जाब विचारणं असतं. प्रकाश आंबेडकरांचा सवाल स्पष्ट आहे की, तुम्ही विजयाच्या उंबरठ्यावर होतात, तरीही माघार घेतली. का? आरएसएस आणि मोदी सरकारने याचं उत्तर दिलंच पाहिजे. फक्त जाहिरातीत राष्ट्रप्रथम म्हणून काही होत नाही. रणांगणातही तसंच दाखवावं लागतं.
हा सवाल फक्त प्रकाश आंबेडकरांचा नाही. तो लाखो देशप्रेमी जनतेचा आहे. एकदा मैदानात उतरल्यावर विजय मिळवायचा असतो मागे हटायचं नसतं. देशाला सुरक्षा हवी, पण सोबतच आत्मगौरवही हवा. तो कुठे हरवतोय, हे आता उघडपणे विचारायची वेळ आलीय.