सुजात आंबेडकर नव्या पिढीशी संवाद साधणार!
मुंबई : वंचित बहुजन आघाडीने ‘जय भीम Gen Z’ या नव्या उपक्रमाची घोषणा केली असून, या उपक्रमाचा पहिला टाउनहॉल २९ सप्टेंबर २०२६ रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटीचे सदस्य, युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या सहभागातून हा संवादात्मक कार्यक्रम होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने आज सोशल मीडियावरून ‘Gen Z ला जय भीम! प्रतीक्षा संपली आहे; सुजात आंबेडकर यांच्यासह ‘जय भीम Gen Z’ मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी औरंगाबादमध्ये येत आहे,’ अशा आशयाच्या संदेशातून या उपक्रमाची घोषणा केली आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून राजकारण, शिक्षण, सामाजिक न्याय, समानता तसेच फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेसह समकालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर तरुण पिढीशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पारंपरिक राजकीय सभांपेक्षा टाउनहॉलचे स्वरूप अधिक संवादात्मक ठेवण्यात येणार असून, तरुणांना प्रश्न मांडण्याची आणि विविध विषयांवर थेट चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते म्हणाल्या, ‘जय भीम Gen Z’ हा फुले-शाहू-आंबेडकर विचारांशी बांधील असलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. Gen Z ही सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वाढता प्रभाव असलेली पिढी आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे.”
त्यापुढे म्हणाल्या की, २०२९ च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Gen Z मधील मोठा मतदार वर्ग निर्णायक सामाजिक-राजकीय घटक ठरू शकतो, त्यामुळे या पिढीशी संवाद साधण्याच्या उद्देशाने ‘जय भीम Gen Z’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
तरुणांच्या प्रश्नांवर थेट चर्चा ―
‘जय भीम Gen Z’ टाउनहॉलच्या माध्यमातून शिक्षणाच्या संधी, रोजगार, सामाजिक समानता, संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय, तंत्रज्ञान आणि तरुणांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग यांसारख्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तरुणांनी केवळ राजकीय चर्चेचे प्रेक्षक न राहता आपल्या प्रश्नांवर थेट संवाद साधावा, हा या उपक्रमा मागील प्रमुख उद्देश असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सांगण्यात आले आहे.
औरंगाबादमधूनच सुरुवात का?
‘जय भीम Gen Z’च्या पहिल्या टाउनहॉलसाठी औरंगाबादची निवडही विशेष महत्त्वाची मानली जात आहे. समृद्ध बौद्ध वारसा, मराठा इतिहास, मध्ययुगीन इस्लामी वास्तुकला आणि आंबेडकरी सामाजिक चळवळींचा प्रभाव अशा विविध ऐतिहासिक-सांस्कृतिक प्रवाहांचा संगम या शहरात पाहायला मिळतो.
मराठवाड्याचे महत्त्वाचे बौद्धिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून औरंगाबादची ओळख आहे. त्यामुळे सामाजिक न्याय, शिक्षण, समानता, संविधान आणि आधुनिक राजकीय हक्क यांसारख्या विषयांवर नव्या पिढीशी संवाद सुरू करण्यासाठी औरंगाबादमधून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे.
२९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘जय भीम Gen Z’ टाउनहॉलकडे आता तरुणांचा संवाद, प्रश्न आणि सहभाग यासाठीच्या नव्या राजकीय-सामाजिक विचारपीठाच्या रूपात पाहिले जात आहे.




