– संजीव चांदोरकर
“रस्ते बांधले, पूल बांधले तर जीडीपी मध्ये भर पडत असेल तर रस्ता वाहून गेला, पूल पडला तर जीडीपी कमी करतात का ? कारण हे तर आपण सतत ऐकत, वाचत असतो. “
शेजारचा दहावीत शिकणारा मुलगा माझ्याशी गप्पा मारत होता. अलीकडेच त्याला टीव्ही वर आणि वर्तमानपत्रात बातम्या असतात त्यात गोडी लागू लागली होती.
काल, आज त्याने नवीन शब्द ऐकला: जीडीपी!
त्याला मी जीडीपी ही संज्ञा समजावून देत होतो
व्हॉव…. याने तर नॅशनल अकाउंटिंग प्रणालीचे कपडे उतरवलेत.
त्याने विचारलेल्या या व अशा प्रश्नात अजून भर घालता येईल.
अनेक वर्षांची झाडे असलेली, हजारो, लाखो एकर वरील जंगले कायमची नष्ट केली जातात , ज्यामुळे पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण होतात….त्याचे प्रतिबिंब नॅशनल अकाउंटिंग मध्ये कसे पडते.
जे तरुण शिकून रोजगार, स्वयंरोजगार करून वस्तुमाल सेवांचे उत्पादन करतात त्यावेळी जीडीपी मध्ये भर घालत असतील तर…ज्यावेळी लाखो तरुण बेरोजगार असतात त्यावेळी त्याचे प्रतिबिंब नॅशनल अकाउंटिंग मध्ये कसे पडते
ही यादी खूप मोठी आहे
जीडीपी कशी मोजतात, यावर त्या क्षेत्रातील अर्थतज्ञ बरेच काही बोलत, लिहित असतात. त्यात अनेक तांत्रिक बाबी असतात. फाईन.
पण वरचा प्रश्न तर एवढा कॉमन सेन्सिकल आहे. ज्याला आपल्याला ज्ञान कमी आहे याचे दडपण नसेल तोच असे बेसिक प्रश्न विचारू शकेल.
जेन झी आणि नंतर येणारी जेन अल्फा…. प्रश्न विचारू लागली आहे आणि भविष्यात राहणार आहे. कारण ते त्यांच्या भाषेत बिनधास्त आहेत.
ओरिजनल विचार क्षमतेची नसबंदी केल्या गेलेल्या प्रौढ माणसांनी या तरुण पिढीपासून खूप काही शिकले पाहिजे.
माहिती, ज्ञान येत राहील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात प्रश्न तयार होणे. त्याहून महत्वाचे ते जाहीरपणे विचारण्याचे धैर्य ठेवणे. त्याची सवय ठेवावी लागते. नाहीतर मेंदूतील ते सेल्स कायमचे मरुन जातात.
प्रश्न विचारले पाहिजेत विशेषतः अर्थव्यवस्थेबद्दल…. जी तुमच्या आमच्या सर्वांच्या भौतिक राहणीमानावर प्रचंड परिणाम करत असते.
विशेषतः अर्थव्यवस्थेबद्दल…. कारण या सुटेड मंडळीनी अर्थशास्त्र कळण्यासाठी , अर्थशास्त्रावर बोलण्यासाठी खूप पुस्तक वाचावी लागतात, पीएचडी असण्याची गरज असते असा सामान्य नागरिकांचा ब्रेनवॉश केला आहे.






