मुंबई : वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीतील अपुऱ्या आणि बंद असलेल्या सुविधांसह विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी – वरळी विधानसभा यांच्या वतीने गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी जी-दक्षिण मनपा विभागीय कार्यालय, नामजोशी मार्ग येथे तिरडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमी ही मुंबईतील जुनी आणि ऐतिहासिक स्मशानभूमी आहे. पूर्वी येथे एकाच वेळी १० ते १२ मृतदेहांवर लाकडावर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था होती. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत नव्हता. मात्र, स्मशानभूमीचा विकास करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पारेख ट्रस्ट आणि जी-दक्षिण विभाग, मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तरीदेखील स्मशानभूमीची सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या अनेक यंत्रणा बंद किंवा अपुऱ्या आहेत. धुराचे प्रदूषण, योग्य वायुवीजनाचा अभाव तसेच ऑक्सिजन आणि हवा खेळती राहण्याच्या व्यवस्थेतील त्रुटींमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील प्रकाशव्यवस्थाही अपुरी असून अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.
याशिवाय, गार्डनच्या नावाखाली दफनभूमीसाठी उपलब्ध असलेली जागा कमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामगार आणि सुरक्षा रक्षकांची पुरेशी व्यवस्था नसल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तसेच परिसरात गर्दुल्ले, अंमली पदार्थांचे सेवन करणारे आणि मद्यपान करणाऱ्या समाजकंटकांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना सन्मानजनक, सुरक्षित आणि आरोग्यदायी अंत्यसंस्काराची सुविधा मिळत नसेल, तर या संपूर्ण विकासकामाची चौकशी करण्यात यावी. तसेच दोषी अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
“मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी सन्मानजनक व्यवस्था करा” या प्रमुख मागणीसह जी-दक्षिण मनपा विभागाच्या कथित भोंगळ कारभाराविरोधात हा तिरडी मोर्चा काढण्यात आला. स्मशानभूमीतील सर्व समस्या तातडीने सोडवून नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चा मोठ्या संख्येने नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी, आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.






