अहमदनगर : शहरातील धीरज परदेशी यांच्या निर्घृण हत्येचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेचा आधार घेत समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तथाकथित नेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या निवेदनानुसार, धीरज परदेशी यांच्या समर्थनार्थ आयोजित आंदोलनाच्या व्यासपीठावरून आमदार अक्षय कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, ह. भ. प. संग्राम भंडारे यांच्यासह इतर वक्त्यांनी चिथावणीखोर व समाजविघातक वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या वक्तव्यांमुळे सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, संविधानिक व लोकशाही मूल्यांचा अवमान झाल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले. ‘एक नागरिक, एक मत, एक मूल्य’ या लोकशाहीच्या समानतेच्या तत्त्वांची सार्वजनिक व्यासपीठावरून अवहेलना करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सोशल मीडियावर साध्या कमेंट किंवा पोस्ट करणाऱ्या सामान्य नागरिकांवर तातडीने कारवाई केली जाते; मात्र सार्वजनिक व्यासपीठावर कथितरीत्या प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्यात प्रशासनाकडून दुहेरी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संविधानाच्या कलम १४ नुसार कायद्यापुढे सर्व समान असताना कोणालाही विशेष वागणूक देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
संविधानाचा अवमान तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणाऱ्या सर्व संबंधित वक्त्यांवर तात्काळ एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडून न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
हे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी सुहास धीवर, अमर निरभवने, संकेत शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





