अक्कलकोट : सोलापूर तालुक्यात एकीकडे मोठमोठ्या शिक्षण संस्था उभ्या राहत असताना आणि खाजगी शाळांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करत संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
बसवन संगोगी येथील या शाळेत कष्टकरी, शेतकरी, मजूर, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
एकीकडे खाजगी शाळांना विविध सुविधा उपलब्ध होत असताना आणि मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असताना, गोरगरीब कुटुंबांतील मुलांसाठी असलेल्या सरकारी शाळांची अशी दुरवस्था का, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून आढावा न घेता प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांच्या इमारतींची तातडीने पाहणी करून धोकादायक इमारती व आवश्यक दुरुस्तीची कामे निश्चित करावीत, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
“एसी कार्यालयात बसून शिक्षण व्यवस्थेवर उपदेश देण्यापेक्षा संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहावी. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ केला जात असेल, तर वंचित बहुजन आघाडी गप्प बसणार नाही,” असा इशारा संघटनेने दिला आहे.
बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची तातडीने पाहणी करून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा वंचित बहुजन आघाडी भाग क्रमांक २च्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.






