पुणे : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष अॅड. अरविंद तायडे यांनी केली.
स्वारगेट येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष अॅड. अरविंद तायडे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ नेते वसंत साळवे उपस्थित होते.
यावेळी अॅड. अरविंद तायडे यांनी सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाचा निर्णय शासनाने जनगणनेनंतरच लागू करावा, अशी भूमिका मांडली. तसेच, तोपर्यंत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ जातींमधील कोणत्याही व्यक्तीने महापुरुषांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे यांनी आपल्या भाषणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाचा गौरव करत त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, ही मागणी वंचित बहुजन आघाडीची असल्याचे स्पष्ट केले.
या अभिवादन सभेला नागेश भोसले, ओंकार कांबळे, अभिजीत बनसोडे, रफिक शेख, सचिन भडकवाड, हिराभाऊ वाघमारे, जीवन रोकडे, माणिक लोंढे, नितीन कांबळे, शुभांगी काकडे, प्रमोद कदम, सिद्धेश्वर झेंडे, प्रतिभाताई कांबळे, मुक्तेश्वर माने, दिलीप क्षेत्रे, सोमनाथ लोंढे, हरी वाघमारे, प्रभाकर सरोदे, जॉर्ज मदणकर, राकेश पवार, बाळासाहेब बनसोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर सचिव प्रा. बी. पी. सावळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिला शहर महासचिव अॅड. रेखाताई चौरे यांनी केले.





