मुंबई : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत देशभर आयोजित करण्यात येणाऱ्या वर्षावास प्रवचनमालिका, बौद्धाचार्य व पाली प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन दि. २९ जुलै २०२६ रोजी मुंबईतील ऐतिहासिक चैत्यभूमी, दादर येथे अत्यंत उत्साहपूर्ण व धम्ममय वातावरणात पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) चे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) च्या वार्षिक गॅझेट तसेच केंद्रीय कार्यकर्ता डायरीचे प्रकाशन डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार धम्म, प्रज्ञा आणि करुणेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या तीन महिन्यांच्या वर्षावास कालावधीत भगवान बुद्धांचा धम्म, प्रज्ञा, शील, करुणा आणि मानवतावादी विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी वर्षावास काळात उपोसथ व शाकाहारी भोजन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या कालावधीत संस्थेच्या देशभरातील विविध शाखा व प्रदेशांमध्ये विशेष धम्मप्रवचनांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी ट्रस्टी व केंद्रीय कार्यालय प्रमुख अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांनी केंद्रीय वार्षिक गॅझेट, संस्थेच्या शाखा, पदाधिकारी, सभासद, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, प्रशिक्षण शिबिरे व समता सैनिक दलाच्या कार्याची माहिती दिली. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १० शाखांची क्रमवारी जाहीर केली. यावेळी भन्ते विशुद्ध बोधी यांनी “गुरु पौर्णिमा व विश्वगुरू तथागत भगवान बुद्ध” या विषयावर मार्गदर्शनपर प्रवचन दिले.
या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने कॅप्टन प्रवीण निखाडे (ट्रस्टी व विदेश सचिव), अॅड. डॉ. एस. एस. वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख), बी. एम. कांबळे (राष्ट्रीय सचिव), भिकाजी कांबळे (राष्ट्रीय सचिव), समता सैनिक दलाचे डी. एम. आचार्य व रविंद्र इंगळे, अशोक केदारे (केंद्रीय कार्यालय सचिव व सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य), भारतीताई शिराळ (केंद्रीय महिला विभाग सचिव), चांदताई कासले (मुंबई प्रदेश अध्यक्षा महिला), सुजाता कांबळे (सरचिटणीस, महाराष्ट्र महिला), प्रशांत गडकरी (कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), सागर गागुर्डे (केंद्रीय प्रशिक्षण विभाग सचिव) आदींची उपस्थिती होती.
मुंबई प्रदेशाच्या वतीने प्रमुख मान्यवरांचे गुरु पौर्णिमेनिमित्त स्वागत करण्यात आले. यावेळी मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास वानखडे, सरचिटणीस दयानंद बडेकर, संस्कार उपाध्यक्ष विलास ढोबळे, चैत्यभूमी व्यवस्थापक व मुंबई प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते. या सोहळ्यात पदाधिकारी, बौद्धाचार्य, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका सहभागी झाले होते.
भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार व प्रसार करणे, समाजात प्रबोधन घडवून आणणे आणि मानवी मूल्यांची रुजवणूक करणे हा या वर्षावास उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. देशभरातील बौद्ध बांधवांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.






