मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय प्रवासात प्रथमच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद आणि राज्य कार्यकारिणी सदस्यपदासाठी पक्षांतर्गत निवडणुका होत असून, पक्षांतर्गत लोकशाही बळकट करण्याच्या दिशेने टाकलेले हे ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. ३० जुलै २०२६ रोजी या निवडणुका पार पडणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी अनिल जाधव, राजेंद्र पातोडे आणि सोमनाथ साळुंखे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. तर राज्य कार्यकारिणीच्या १२ जागांसाठी एकूण २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Also Read : ‘जय भीम’ आणि ‘इंकलाब जिंदाबाद’च्या नाऱ्यांनी जंतर मंतर दणाणले; लाखो युवकांचा दिल्लीत एल्गार
देशातील बहुतांश राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक पदांसाठी नियुक्ती किंवा एकमताच्या माध्यमातून निवड केली जाते. मात्र, वंचित बहुजन आघाडीने पक्षाचा कारभार लोकशाही पद्धतीने चालावा, नेतृत्वाची निवड ही पारदर्शक प्रक्रियेतून व्हावी आणि कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेत थेट सहभाग मिळावा, या उद्देशाने पक्षांतर्गत निवडणुकांचा मार्ग स्वीकारला आहे. (VBA’s Historic Internal Election)
भारतीय राज्यघटनेतील लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने ती मूल्ये केवळ विचारांतच नव्हे, तर संघटनात्मक रचनेतही रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाच्या नेतृत्वाची निवड कार्यकर्त्यांच्या सहभागातून आणि मतदानाच्या लोकशाही प्रक्रियेतून होत असल्याने ही निवडणूक विशेष महत्त्वाची ठरत आहे.
या निवडणुकांमुळे पक्षातील अंतर्गत लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होणार असून, नव्या नेतृत्वाला लोकशाही प्रक्रियेतून पुढे येण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर्गत निवडणुका ही बाब तुलनेने दुर्मीळ असताना, वंचित बहुजन आघाडीने उचललेले हे पाऊल इतर राजकीय पक्षांसाठीही दिशादर्शक ठरू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Also Read : स्मार्ट मीटर हटवा, बोगस बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीचे मुर्तिजापूरमध्ये निवेदन
त्यामुळे ३० जुलै रोजी होणाऱ्या या निवडणुकांकडे केवळ पक्षांतर्गत निवडणूक म्हणून नव्हे, तर लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी आणि संविधानवादी राजकारणाच्या बळकटीकरणासाठी उचललेले एक ऐतिहासिक पाऊल म्हणून पाहिले जात आहे. (VBA’s Historic Internal Election)






