माळशिरस : तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे शेतात मजुरीचे काम करणाऱ्या उषा साठे या अनुसूचित जातीतील महिला मजुराची गोळी झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मृत उषा साठे यांचे कुटुंब मूळचे माळखांबी गावचे असून, मागील १० वर्षांपासून आरोपी सचिन देशमुख याच्याकडे मजुरीचे काम करत होत्या. आरोपीने आर्थिक आणि जातीय मानसिकतेतून एका गरीब महिलेचा बळी घेतल्याचे बोलले जात आहे. दलित महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराबाबत शासन आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे उदासीन असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या अमानुष घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे. नसरापूर घटनेच्या धर्तीवर हा खटला चालवून ५० दिवसांच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शासनाने सक्षम सरकारी वकील नेमावा अशी मागणी केली जात आहे.
तसेच, आरोपीने हे शस्त्र कुठून आणले आणि या हत्येच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करून आरोपीची संपत्ती जप्त करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
माळशिरस हा राखीव मतदारसंघ असूनही स्थानिक आमदारांनी अद्याप पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध केला जात असून, पीडित कुटुंबाला तात्काळ कायदेशीर न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे.



