मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत दुर्घटनांची मालिका सुरू असतानाच मानखुर्द परिसरात रविवारी रात्री हृदयद्रावक घटना घडली. धोकादायक घोषित करण्यात आलेल्या तीन मजली चाळीचा मोठा भाग अचानक कोसळल्याने ६ लहान मुले, एका महिलेसह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता असल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. (Mankhurd Building Collapse)
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चाळ अतिधोकादायक असल्याने महापालिकेने ती रिकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रहिवासी रविवारी घरातील सामान हलविण्याचे काम करत होते. मात्र रात्री साडेआठच्या सुमारास चाळीचा मोठा भाग अचानक कोसळला आणि अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले.
Also Read : नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा
या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच चिमुकले आणि एका महिलेचा मृत्यू झाला असून शेजारील घरातील एका मुलाचाही जीव गेला आहे. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, मुंबई महापालिका, पोलीस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा हटवून अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (Mankhurd Building Collapse)
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाळीची रचना अधिक कमकुवत झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.






