नेरुळ, नवी मुंबई : नेरुळ येथील एल.पी. नाका परिसरात साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागून त्या गंभीर जखमी झाल्या. दोघींवर सध्या वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी फोर्टिस रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनींची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी फोर्टिस रुग्णालयाचे डीन देसाई यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. जखमी विद्यार्थिनींवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्यात यावेत व त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, महावितरणच्या प्राथमिक तपासणीत पथदिव्यांच्या वीजजोडणीच्या केबलचे इन्सुलेशन तुटल्यामुळे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित वीजजोडणीची देखभाल ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप विद्यार्थिनींचे जीव धोक्यात आल्याचा सांगितले. या प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली.
तसेच महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता (परिमंडळ-१), संबंधित पर्यवेक्षक, कर्मचारी आणि देखभाल ठेकेदार यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही त्यांनी मागणी केली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, उपाध्यक्ष गौतम चव्हाण, सतीश खंडाळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



