पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील विद्यार्थ्यांना दोनवेळा एटीकेटी (ATKT) लागल्यास अपात्र ठरविण्याची अट रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने आज समाज कल्याण विभागाकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रतिनिधींनी समाज कल्याण विभागाचे सह आयुक्त प्रमोद जाधव यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी मांडल्या. निवेदनात त्यांनी स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रियेदरम्यान एटीकेटी लागल्यामुळे योजनेतून वगळणे अन्यायकारक असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे दोनवेळा एटीकेटी असल्यास विद्यार्थ्यांना अपात्र ठरविणारी जाचक अट तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी सह आयुक्त प्रमोद जाधव यांनी निवेदनाची दखल घेत सदर मागणी शासनाकडे पाठवून त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहरचे महासचिव अभिषेक चरण कांबळे, माजी अध्यक्ष चैतन्य प्रभाकर इंगळे, संघटक प्रशिक संजय भारदे, ओम संजय तांबे आणि प्रणव प्रकाश कांबळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आणि स्वाधार योजनेतील लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने ही मागणी लावून धरली असून, शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.




