नांदेड : नांदेड जिल्हा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूक २०२६ मधील मतदान प्रक्रियेबाबत गंभीर शंका उपस्थित करत उमेदवार इंजि. प्रशांत विराज इंगोले यांनी भारत निवडणूक आयोगाकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. निवडणुकीतील काही मतपत्रिकांवर उमेदवारांसमोर करण्यात आलेल्या खुणांच्या वैधतेबाबत स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
इंगोले यांनी भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, नांदेडचे जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक निरीक्षक यांना पाठविलेल्या निवेदनात मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
निवेदनात, मतदानासाठी देण्यात आलेल्या अधिकृत सूचनांमध्ये मतदारांनी उमेदवारांसमोर पसंतीक्रम म्हणून “1” किंवा रोमन अंक “I” लिहिण्याची तरतूद होती. मात्र मतदानानंतर अनेक मतदारांनी उमेदवारांसमोर केवळ साधी उभी रेघ मारल्याची चर्चा विविध स्तरांवरून समोर येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
यामुळे अशा खुणांना वैध मत म्हणून स्वीकारताना कोणते निकष लावण्यात आले, मतदाराचा हेतू कसा निश्चित करण्यात आला, सर्व मतपत्रिकांवर समान निकष लागू करण्यात आले का आणि अशा मतांची संख्या निकालावर परिणाम करणारी होती का, असे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे इंगोले यांनी म्हटले आहे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदानाची गुप्तता जितकी महत्त्वाची आहे, तितकेच मतमोजणीचे निकष स्पष्ट, पारदर्शक आणि सर्वांसाठी समान असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्रपणे पडताळणी करून मतपत्रिकांवरील खुणांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तपासणीत कोणतीही विसंगती अथवा नियमांच्या अंमलबजावणीत तफावत आढळून आल्यास निवडणूक कायद्यानुसार योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी इंगोले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन त्यांनी निवडणूक आयोगाला केले आहे.


