मुंबई : राज्यात ऑपरेशन टायगरनंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. शिवसेना उबाठाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आज राज्यातील विधान परिषद निवडणुकींचा निकाल सुद्धा जाहीर झाला. यात अमरावती, नागपूर, उस्मानाबाद याठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी थेट भाजपला मतदान करून भाजपचा विजय घडवून आणला.
यावर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक प्रतिक्रिया देतांना म्हटले की, शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदार भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेत सामील झाले आहेत.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या शेकडो नगरसेवकांनी भाजप व भाजप-नेतृत्वाखालील महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने क्रॉस-व्होटिंग केले.
ज्या पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी संविधान, लोकशाही आणि आरक्षण वाचवण्यासाठी भाजपविरोधात त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते, त्या पत्रकारांच्या आणि विचारवंतांच्या घरासमोर फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी शांततापूर्ण मोठे आंदोलन केले पाहिजे. त्यांनी पाठिंबा दिलेले उमेदवार आणि पक्ष एकतर भाजपमध्ये सामील झाले किंवा त्यांनी भाजपला मतदान केले. काही निर्लल्ज लोकांनी फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांची दिशाभूल केली. त्यांना जबाबदार धरले पाहिजे, असे आवाहन केले आहे.
वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे महाविकास आघाडी, विरोधी पक्ष आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या काही पत्रकार व तथाकथित विचारवंतांवर तीव्र टीका केली आहे.
पक्षाने आपल्या भूमिकेत म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीदरम्यान संविधान, लोकशाही आणि आरक्षण वाचविण्याच्या नावाखाली भाजपविरोधी मतदानाचे आवाहन करणाऱ्या अनेक पत्रकार, विश्लेषक आणि विचारवंतांनी जनतेसमोर विशिष्ट राजकीय भूमिका मांडली होती. मात्र, आता त्याच राजकीय पक्षांमधील अनेक नेते भाजपच्या मित्रपक्षांमध्ये सामील होत असल्याचे चित्र दिसत आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेमुळे राज्यातील विरोधी राजकारण, महाविकास आघाडीची विश्वासार्हता, तसेच लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः विरोधी पक्षांच्या नेत्यांचे पक्षांतर, क्रॉस-व्होटिंगच्या घटना आणि राजकीय निष्ठा यावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण निर्माण झाले आहे.
२०२४ च्या निवडणुकी दरम्यान अनेक पत्रकार, तथाकथित विचारवंतांनी जाहीरपणे वंचित बहुजन आघाडीला मतदान न करता महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन जनतेला केला होते, तीच सर्व खासदार आता भाजपप्रणीत शिंदेंसेनेत गेली आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने मांडलेल्या भूमिकेमुळे फुले-शाहू-आंबेडकरवादी राजकारणाच्या वर्तुळात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.



