अकोला : काटीपाटी बॅरेज संग्रहाक प्रकल्पामुळे शेती बाधित झालेल्या रोहणा येथील मातंग समाजातील तायडे कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे तात्काळ न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
रोहणा येथील अंबादास तायडे, गिरीजा तायडे व मनोहर तायडे यांच्या मालकीची गट क्रमांक 20 मधील नदीलगतची शेती काटीपाटी बॅरेज संग्रहाक प्रकल्पात गेली असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, संबंधित शेतजमिनीचा लाभ तायडे कुटुंबाला न देता दुसऱ्याच शेतकऱ्याला आर्थिक मोबदला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे तायडे कुटुंबावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत वयोवृद्ध अंबादास तायडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रखर उन्हात आमरण उपोषण सुरू केले होते. ही माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि माजी सभापती आनंद डोंगरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मातंग समाजाचे कार्यकर्ते गजानन दांडगे यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची सूचना करण्यात आली.
यानंतर गजानन दांडगे, वंचित नेते प्रदीप उर्फ बबलू शिरसाट, सुनील अवचार आणि अशोक अंभोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत तात्काळ लघु पाटबंधारे विभागाचे डेप्युटी सीईओ अविनाश कुंभार, सहाय्यक अधिकारी तिजारे आणि तलाठी पाटकर यांना उपोषणस्थळी पाठवून सर्व कागदपत्रांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांनी प्राथमिक पाहणीनंतर तायडे कुटुंबावर अन्याय झाल्याच्या दाव्याची शहानिशा करण्यासाठी शुक्रवार, दि. 5 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच तक्रारीची सखोल चौकशी करून योग्य न्याय देण्याचे आश्वासन देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे लेखी आदेश मिळाल्यानंतर अंबादास तायडे यांनी आपले उपोषण मागे घेतले. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे तायडे कुटुंबाला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना मातंग समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. याबद्दल समाजबांधवांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी गजानन दांडगे, प्रदीप उर्फ बबलू शिरसाट, आनंद डोंगरे, सुनील अवचार, अशोक अंभोरे, मधूकर गोपनारायण आणि सुधाकर मोरे उपस्थित होते.





