जालना : परतूर तालुक्यातील नागापूर येथे आदर्श आचारसंहिता लागू असताना आयोजित करण्यात आलेल्या ‘१७३ गाव वॉटर ग्रीड जलशुद्धीकरण केंद्र’ उद्घाटन सोहळ्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जालना (पूर्व) जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, आचारसंहिता लागू असतानाही या शासकीय प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार बबनराव लोणीकर, विविध शासकीय अधिकारी तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याने वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
रामप्रसाद थोरात यांनी दिलेल्या तक्रारीत, उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आले. तसेच शासकीय बॅनरवर कोणतेही अधिकृत पद नसलेल्या राहुल लोणीकर यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याबाबतही आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. तसेच योग्य कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याबरोबरच न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. दरम्यान, या तक्रारीच्या प्रतिलिपी राज्य निवडणूक आयुक्त तसेच विभागीय आयुक्त यांनाही पाठविण्यात आले आहे.






