पैठण : महाराष्ट्रातील वाढती महागाई, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसणे तसेच राज्यातील पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पैठण (दि. 31) शहरातील बसस्थानक चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक सारंग यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आले.
आंदोलनादरम्यान वक्त्यांनी राज्यातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे सांगितले. तसेच जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील मौजे वझर येथील शेतकरी गोपीनाथ सरकटे यांचा डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावरील रांगेत उभे असताना मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे नमूद करून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या :
1. शेतमालाला हमीभाव देणारा कायदा तात्काळ लागू करावा.
2. शेतकरी गोपीनाथ सरकटे यांच्या मृत्यूप्रकरणी शासनाने जबाबदारी स्वीकारून त्यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
3. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला सरसकट प्रतिक्विंटल 2,000 रुपये भाव द्यावा.
4. पेट्रोल-डिझेल टंचाईवर तातडीने उपाययोजना करून इंधन वितरण सुलभ व जलद करावे.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, जिल्हा सचिव बबलूशेठ बागवान, भगवान बनसोडे, भारत आठवले, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश बोरुडे, तालुका महासचिव अतुल गिरी, उपाध्यक्ष राम मिसाळ, शहर महासचिव दत्ता वाहुळे, छबुराव बनकर, ज्ञानदेव आडसूळ, दीपक गायकवाड, युवा आघाडीचे प्रमोद सूर्यवंशी, सुरेश केसापुरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.






