औरंगाबाद : औरंगाबादमधील ऐतिहासिक वारसा असलेल्या सलीम अली सरोवराच्या (Salim Ali Lake) संवर्धनासाठी आता नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका जरिना जावेद कुरैशी यांनी सरोवराला आंतरराष्ट्रीय दर्जाचा लूक देण्यासाठी विशेष आराखडा महापौर समीर राजूरकर यांच्यासमोर सादर केला. या प्रस्तावावर प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली असून, पर्यावरण आणि वारसा जपण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला.
सरोवर संवर्धनाच्या चर्चेत इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनीही सहभाग घेतला. त्यांनी सलीम अली सरोवराचा ऐतिहासिक वारसा आणि त्याची सध्याची बिकट अवस्था अधोरेखित करत प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. मलिक अंबर यांनी १६१० ते १६१६ दरम्यान शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी या तलावाची निर्मिती केली होती. या पाझर तलावामुळे परिसरातील विहिरींना शुद्ध पाणी मिळत असे, तसेच तलावात कमळांचीही मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती.
डॉ. शेख यांनी सांगितले की, १९८० नंतर तलावात ड्रेनेजचे पाणी सोडले जाऊ लागल्याने जैवविविधतेवर गंभीर परिणाम झाला. या विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी सिडको प्रशासनाने ड्रेनेजचे पाणी रोखण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक वर्षांनंतरही समस्या कायम असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
महापालिकेने यापूर्वी सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून सरोवर परिसराचे सुशोभीकरण केले होते. मात्र, पर्यावरणप्रेमींनी यास विरोध दर्शवत न्यायालयात याचिका दाखल केली होती. नागरिकांची वाढती गर्दी आणि त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन सरोवर परिसरातील प्रवेश मर्यादित करण्यात आला होता.
दरम्यान, ड्रेनेज समस्येवर उपाय म्हणून उभारण्यात आलेला एसटीपी प्रकल्प सध्या बंद अवस्थेत असून, तुलनेने कमी खर्चात ही समस्या सोडवता येऊ शकते, असेही डॉ. शेख यांनी स्पष्ट केले. सलीम अली सरोवराचे संवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक विकास यासाठी प्रशासनाने आता ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



