अहमदनगर : खर्डा येथे भटके-विमुक्त आदिवासी समुदायाच्या पालावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरु-शिष्य जयंतीनिमित्त प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक उज्वल सिंह राजपूत होते.
यावेळी बोलताना राजपूत यांनी सांगितले की, अशा प्रबोधन मेळाव्यांमुळे समाजात समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य ही संविधानिक मूल्ये रुजण्यास मदत होते. प्रत्येक समाजघटकाने अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख मार्गदर्शक अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मी स्वतः भटके-विमुक्त समाजातून आलो आहे. शिक्षणामुळेच माझे आयुष्य बदलले. त्यामुळे आपल्या मुलांना शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. माझे आयुष्य वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढण्यातच जाणार आहे.”
प्रमुख पाहुणे पत्रकार संतोष थोरात यांनी भटके-विमुक्त आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधावी, असे मत व्यक्त केले. शेतकरी संघटनेचे नेते सुनील लोंढे यांनी गुरु-शिष्य जयंती साजरी करण्याची संकल्पना अभिमानास्पद असल्याचे नमूद केले.
मार्केट यार्ड समितीचे संचालक वैजनाथ पाटील यांनी ग्रामीण विकास केंद्राच्या कार्याचे कौतुक करताना, ही संस्था वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले.
यावेळी शाहीर बाबासाहेब राजगुरू, सलीम मदारी, आरोग्य सल्लागार सचिन पवळ, शिक्षक जाहीर शेख, धनसिंग साळुंके आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. सर्व वक्त्यांनी महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता इंगळे व रिजवान बागवान यांनी केले. प्रस्तावना विशाल पवार यांनी केली, तर अध्यक्षीय सूचना मंगल शिंगाणे यांनी मांडल्या. उर्मिला कवडे यांनी अनुमोदन दिले आणि आभार प्रदर्शन गणपत कराळे यांनी केले.
हा कार्यक्रम ग्रामीण विकास केंद्र संचालित भटके-विमुक्त संसाधन केंद्र आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






