पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी थेट लढत
अहमदनगर : राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आमदार संग्राम जगताप आणि नितेश राणे यांच्यावर तीव्र टीका केली आहे.
राहुरीत गेल्या तीन चार वर्षांपासून धार्मिक वातावरण बिघडवून दंगल घडवण्याचे षडयंत्र सुरू आहे. हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये द्वेष पसरवण्याचे काम सुरू असल्याचेही युवा नेते सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.
एक भाजपचे दोन फुटाचा नेते आहे नितेश राणे. त्यांनी इथे येऊन लव्ह जिहाद विरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य केलं होतं. ज्या चौकात त्यांनी गरळ ओकली होती, त्याच चौकात वंचित बहुजन आघाडीने सभा घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले होते.
नितेश राणेनंतर या राहुरीत भडकाऊ वक्तव्य करणारा अजून एक आयटम तयार झाला संग्राम जगताप नावाचा, तो सर्वात पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून आमदार झाला. त्याला मते कोणी दिली तर मुस्लिमांनी दिली. मग या पठ्ठ्याचा पक्ष फुटला, अजित दादा एका बाजूला गेले. आता शरद पवार सुद्धा भाजपमध्ये जाणारच आहेत. मग संग्राम जगताप यांनी स्वतःच मार्केट वाढवण्यासाठी मुस्लिमांना शिव्या द्यायला सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. पण हा पठठ्या हे विसरला की, यांना पहिल्यांदा धर्मनिरपेक्ष मतदारांनी, इथल्या मुस्लिमांनी मते देऊन आमदार केलं होत, असे त्यांनी सुनावले.
दरम्यान, राहुरीतील ही निवडणूक थेट वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपला पराभूत करायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके यांना निवडून देणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा उमेदवार हा केवळ डमी असून तो भाजपच्या फायद्यासाठी उभा करण्यात आल्याचा आरोप करत काही आर्थिक व्यवहार आणि राजकीय समन्वयाच्या आधारे ही उमेदवारी उभी असल्याचे सूचक विधान त्यांनी केले. ही लढत ‘सेटिंगच्या राजकारणा’ची असल्याचेही त्यांनी म्हटले.
या सर्व पार्श्वभूमीवर मतदारांनी सावध राहून ‘सेटिंगच्या राजकारणा’ला नाकारावे आणि पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.





