नांदेड : शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी आणि काळ्या काचा (ब्लॅक फिल्म) असलेल्या वाहनांच्या वाढत्या वावराविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांत नांदेड शहरात गॅंगवार, खून यांसारख्या गंभीर घटना घडत असून अवघ्या ७० तासांत ५ खून झाल्याच्या घटनांनी शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलांच्या टोळ्या तयार होत असून त्यांचा गुन्हेगारीत वाढता सहभाग ही चिंतेची बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच काही गँगस्टर जेलमधूनच बाहेरील टोळ्यांचे संचालन करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शहरात काळ्या काचा लावलेल्या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला असून विशेषतः रात्री ९.३० नंतर अशा वाहनांची संख्या वाढत आहे. या वाहनांमधील व्यक्तींची ओळख पटत नसल्याने गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. मोटार वाहन कायदा १९८८ आणि सेंट्रल मोटार व्हेईकल नियम १९८९ मधील नियम १०० तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा ब्लॅक फिल्मवर बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगण्यात आले.
वाढत्या गुन्हेगारीचा परिणाम शहराच्या शैक्षणिक व आर्थिक वातावरणावर होत असून ११वी-१२वी तसेच NEET, JEE सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याचा परिणाम स्थानिक बाजारपेठ, लहान व्यवसाय आणि गुंतवणुकीवरही होत असल्याचे सांगण्यात आले.
निवेदनात अवैध गुटखा, दारू, मटका, वाळू तस्करी, वेश्याव्यवसाय, लूटमार, पाकिटमारी, शस्त्राच्या धाकावर गुन्हे, गांजा सेवन करून प्रवाशांना धमकावणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन अशा विविध समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
मुख्य मागण्या :
– काळ्या काचा असलेल्या वाहनांवर विशेष मोहीम राबवून कारवाई व जप्ती करणे
– शहरातील गँग व टोळ्यांवर कठोर कारवाई करून मुख्य आरोपींना अटक करणे
– जेलमधून चालणाऱ्या गुन्हेगारी नेटवर्कवर बंदी
– रात्री कडक नाकाबंदी व पोलीस गस्त वाढवणे
– सर्व अवैध धंद्यांवर बंदी व संबंधितांवर गुन्हे दाखल करणे
– विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करणे
या संदर्भात तात्काळ आणि ठोस कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी दिली. तसेच, लवकर कारवाई न झाल्यास नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांसह प्रशासनाविरोधात भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ही मागणी उत्तर जिल्हाध्यक्ष इंजि. राज अटकोरे, दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन आणि इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.






