मिरज : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे कार्यरत “२९ दिवस तत्त्वावरील न्यायालयीन चतुर्थश्रेणी बदली” कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ११ एप्रिलपर्यंतही वेतन जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कामगार कायद्यांनुसार, कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत खात्यात जमा होणे बंधनकारक आहे. मात्र, या स्पष्ट तरतुदीकडे दुर्लक्ष करत प्रशासनाने ११ एप्रिल उलटूनही वेतन न दिल्याने कायद्याचे उल्लंघन झाल्याची चर्चा सुरू आहे.
दरमहा वेळेत पगार मिळण्यावर अवलंबून असलेल्या या कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बहुसंख्य कर्मचारी वंचित, बहुजन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असल्याने त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे मासिक वेतनावर अवलंबून आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी घरगुती खर्च भागवण्यासाठी आणि जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अग्रिम वेतनाची मागणी केली होती; मात्र प्रशासनाकडून ना अग्रिम देण्यात आले, ना नियमित वेतन.
Also Read : मराठवाडा हादरला! परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
मागील वर्षीही जयंतीच्या काळात वेतन उशिरा मिळाल्याची घटना घडली होती. यंदाही तोच प्रकार पुन्हा घडल्याने हा विलंब जाणीवपूर्वक होत असल्याचा संशय कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 336, 337, 342 आणि 351 लागू होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. पदाचा दुरुपयोग, कामगारांच्या हक्कांचे उल्लंघन आणि आर्थिक नुकसान या गंभीर बाबींचा यात समावेश होऊ शकतो.
दरम्यान, “वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन”ने प्रशासनाला थेट इशारा देत १४ एप्रिल रोजी धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे.
Also Read : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू
आंदोलनाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल
अधिष्ठाता कार्यालयासमोर सकाळी १० वाजता कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग असलेले शांततामय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, भारतीय राज्यघटनेचे सामूहिक वाचन आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
– थकित वेतन १४ एप्रिलपूर्वी तात्काळ जमा करणे
– वेतन विलंबास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे
– वेतन वेळेत मिळण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करणे
– कामगारांच्या प्रश्नांवर लेखी उत्तर देणे
Also Read : RBI UPI Rules : PhonePe, Google Pay वापरताय? मग हे वाचाच! RBI कडून ‘किल स्विच’सह मोठे बदल लागू
“मागण्या मान्य न झाल्यास १४ एप्रिलचे आंदोलन अपरिहार्य असेल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील,” असा इशारा संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी दिला आहे. मिरजमधील वैद्यकीय व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन न मिळणे ही केवळ प्रशासकीय त्रुटी नसून मानवी संवेदनशीलतेलाही धक्का देणारी बाब ठरत आहे. आता प्रशासन यावर तातडीने निर्णय घेते की आंदोलनाला सामोरे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






