बारामती : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत असून, पक्षाने सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक विशेष चर्चेत होती. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच महायुतीकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्येही विविध स्तरांवर चर्चा, संवाद आणि विचारमंथन सुरू होते. (Baramati By poll)
Also Read : राहुरीत ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत निवडणूक निधीसाठी ५० हजारांची देणगी, संतोष चोळकेंना बळ
अनेक दिवस चाललेल्या अंतर्गत चर्चांनंतर काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय जवळपास निश्चित केल्याचे समजते. पक्षातील काही नेत्यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका मांडली होती, तर काहींनी सध्याच्या राजकीय समीकरणांचा विचार करून माघार घेण्याचा पर्याय योग्य असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चेनंतर बारामतीतील निवडणुकीबाबत समन्वय साधण्याचा प्रयत्न झाल्याचेही बोलले जात आहे. (Baramati By poll)
Also Read : खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप
विशेष म्हणजे, वंचित बहुजन आघाडीने याआधी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसला समर्थन देण्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र काँग्रेसकडून माघारीचा निर्णय घेतला गेला.






